मचाण : अधुरी एक कहाणी!

रविवार लोकसत्ता  , २८ फेब्रुवारी २०१०
बहार बाविस्कर -
९९७५६८०३७५




 वन्यजीव पशुवैद्यक म्हणून जीवनात बरेच प्रसंग येऊन गेले. काही विनोदी, काही गंभीऱ, काही आनंद देणारे तर काही सलणाऱे  प्रत्येक प्रसंगातून माझ्यातला माणूस घडत गेला़ कधी मनाच्या पेल्यात समाधान भरभरून घेतलं तर कधी मात्र हा पेला रिताच राहिला़ अस्वस्थ करून सोडणाऱ्या आठवणींच्या रूपाने!!
 गडचिरोलीच्या जंगलातून एक मादी अस्वल वनविभागाने उपचारासाठी नागपूरला आणली. रात्री झालेल्या एका अपघातात ट्रकने मादीला जोरदार धडक मारली. विव्हळत ती मादी रात्रभर रस्त्यावर पडून होती़ तिचा जोडीदार नर थोडावेळ तिच्यापाशी बसला होता पण, नंतर गाडय़ांची वर्दळ वाढल्याने तो जंगलात निघून गेला़ मादी अस्वलाच्या पाठीच्या कण्याला जबर दुखापत झालेली होती त्यामुळे ती चालू शकत नव्हती, समोरच्या उजव्या पायाचे हाड सरकले होते त्यामुळे उभी राहू शकत नव्हती़  जमलेल्यांपैकी काही जणांनी भविष्यदेखील सांगून टाकले, ‘हे अस्वल फार तर आठवडाभर जगेल.’ वनविभागाने उपचारासाठी ते अस्वल नागपूरला आणल्यानंतर आम्ही पशुवैद्यक तिच्या शारीरिक क्षमतेचा आढावा घेत होतो़ काही वरिष्ठ पशुवैद्यकांनी निदान केलं की ती आता कधीच उभी राहू शकणार नाही़ हा संवाद सुरू असतानाच मी त्या अस्वलीच्या डोळ्यात बघितलं़  तिने डोळ्यांनीच जवळ येण्यासाठी खुणावलं़  मी जवळ गेलो आणि लगेचच आमचा ‘मूक’ संवाद सुरू झाला़ तिची पुन्हा उभं राहण्याची, जंगलातल्या आपल्या जोडीदाराला पुन्हा भेटण्याची अन् त्याच्यासोबत जंगल फिरण्याची इच्छा तिच्या डोळ्यात वाचली़ तेव्हाच ठरवलं. तिचा तात्पुरता जोडीदार बनून तिला उभं करायचं अन् जंगलात परत सुद्धा सोडायचं, तिच्या खऱ्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी!! भेटीदरम्यानच नामकरण सुद्धा करून टाकलं ‘राणी.’ आता ती आम्हा सगळ्यांची राणी झाली होती.
गडचिरोलीहून नागपूरला लोखंडी पिंजऱ्यातून आणताना राणीने गजांना चावून स्वत:चे सगळे दात तोडून घेतले होते. त्यामुळे तोंडात खूप जखमा झाल्या होत्या. तोंड रक्ताने लाल झालेलं अन् समोरचे सगळे दात अर्धवट तुटलेले !! पिंजऱ्याजवळ कुणाच्या येण्याचा साधा आवाज जरी आला तरी ती रागाने चालून यायची़  पिंजरा जोरजोरात हलवून आपला राग व्यक्त करायची आणि रागाच्या भरात पिंजऱ्याला कडकडून चावायची़ तोंडातून रक्त येऊ  लागलं की विव्हळत शांत व्हायची आणि वेदनेने कण्हत बसायची़  ते दृश्य बघवत नव्हतं पण, नाईलाज होता़  मला असा पिंजरा हवा होता की ज्याच्यात राणीला पिंजऱ्याला चावा घेता येणार नाही आणि तिचे औषधपाणी सहजरीत्या करता येईल पण, पैशाअभावी काम अडत होतं़  वनविभागाकडे खास वेगळ्या प्रकारचे पिंजरे उपलब्ध नव्हत़े म्हणून मग आहे त्या पिंजऱ्यावरच काम निभावण्याचं ठरवलं. हळूहळू राणी माझ्यासोबत रूळू लागली होती. परिस्थिती कठीण होती पण हाताबाहेर गेलेली नव्हती़ दातांना इजा झालेली असल्याने तिला द्राक्षे, केळी, काकडी आणि अंडी यासारखे नरम पदार्थ द्यायला सुरुवात केली़ पाणी पिताना तिला थोडासा त्रास होत असे म्हणून मग लांब दांडय़ाच्या पेल्याने तिला पाणी पाजायला सुरुवात केली़  तिचा आहार वाढत चालला होता आणि म्हणूनच मृत्यूपासून ती दूर चालली होती़ उपचाराचा पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला होता़ एकदा सहज म्हणून राणीला एका हाताने आधार देऊन उभं करण्याचा प्रयत्न करून बघितला़ आधार काढल्याबरोबर मात्र ती दाणकन् जमिनीवर आदळली अन् वेदनेने तळमळली़  माझं मलाच वाईट वाटलं़ त्यानंतर मात्र मी तिला स्वत:हून उठवण्याचा प्रयत्न न करण्याचं ठरवलं़  घाई करून अजिबात चालणार नव्हतं.
 माझी सहाध्यायी डॉ़ प्रिया गावंडेने देखील राणीच्या उपचारांचा हा प्रवास माझ्यासारखाच भावनिक बनवून टाकला होता़ प्रियाच्या प्रयत्नांमुळे एका स्वयंसेवी संस्थेने राणीच्या उपचारासाठी आर्थिक मदत देऊ  केली़ पैशांचा प्रश्न सोपा झाल्यामुळे आता राणीचे अधिक लाड करण्याचे ठरवल़े राणीच्या आहारात आता रोजच तिचे आवडते खाद्य ‘मध’येऊ  लागल़े आहार हळूहळू वाढत चालला होता आणि अंगात ताकदही येत होती़  एक-दीड महिन्यात ती पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात सरकू लागली़  तिच्या समोरच्या उजव्या पायात आणि पाठीच्या कण्यात थोडीशी ताकद येऊ  लागली तशी ती स्वत:हून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली़  जसजसं तिचं बळ वाढू लागलं तशा तिच्या हालचाली वाढू लागल्या़  सोबतीला तिची नाटकंही वाढू लागली राणीसाठी रोज खास ‘डॉग बिस्किटस्’ आणली जाऊ  लागली़  सुरुवातीला तिने ते आवडीने खायला सुरुवात केली पण बिस्किट कडक असल्यामुळे लगेच तोंडाबाहेर काढल़े  म्हणून मग मी बिस्किटं मधात बुडवून द्यायचे ठरवल़े पण, इथेसुद्धा राणी चलाखी करत अस़े  ती बिस्किटावरचे मध चोखून घेई आणि बिस्किट बाहेर  फेकून देई़ पुन्हा बिस्किटाला मध लावून राणीला खायला दिले की लबाड राणी पुन्हा मध चोखून घेई आणि पुन्हा बिस्किट बाहेर फेकून देई़  म्हणून मग बिस्किटं दुधात भिजवून द्यायला सुरुवात केली़  ही भिजवलेली बिस्किटं मात्र ती चवीने खाऊ लागली. काकडीचेही तसेच! काकडीला लावलेले मध चोखून घेऊन राणी काकडी बाहेर काढून टाकत अस़े  थोडंसं रागावलं की मग मात्र नुसती काकडीही निमूटपणे गिळून घेत अस़े  तिच्या या नाटकांना आम्ही मनापासनं दाद देत असू़ तिच्या पिंजऱ्याजवळ तासन् तास बसून तिचे लाड करत असू़ राणी कधी माझ्यावर रूसली तर प्रिया तिची समजूत काढत असे आणि कधी प्रियावर रूसली तर मी राणीची समजूत काढत अस़े   आम्हा दोघांना राणीचा आणि राणीला आम्हा दोघांचा चांगलाच लळा लागला होता़
राणीचा राजा बनल्यापासनं तर माझ्यात जणू नवीन उत्साह संचारला होता़ तिची रवानगी गडचिरोलीच्या जंगलात करण्याआधी तिला नवेगावच्या जंगलात महिन्याभरासाठी तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्याची तयारी मी चालवली होती़ तिथे राणी जिंकली तर लगेचच तिला आणखी एका महिन्याभरात जंगलात सोडायचं होतं, तिच्या खऱ्या प्रियकरासोबत भेटवण्यासाठी ! वनविभागाने देखील या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे ठरवल़े नवेगावच्या भीमसेन पाटील यांच्याशी संपर्क साधला़  त्यांनी राणीच्या जंगलाच्या परतीच्या प्रवासासाठी होकार दिला आणि जमेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल़े  सगळे काही व्यवस्थित सुरू होते.
 राणीला लागलेली आमची सवय मोडावी अन् एकाकी वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय लागावी म्हणून हळूहळू तिच्या पिंजऱ्यापाशी जाणं कमी केलं़  नंतर हे अंतर वाढवत नेण्याचं ठरवलं़  होळीच्या काही दिवस आधी तिला दिवसाआड भेटायला सुरूवात केली पण, एक दिवसाचा तो विरह मला अजिबात सहन होत नस़े  त्या दिवशी मला अजिबात करमत नस़े  राहून राहून राणीची आठवण यायची़  होळीचे दिवस जवळ येत होते. होळीच्या त्या दोन तीन दिवसात राणीला न भेटण्याचं ठरवलं़  त्याच वेळी राणी तिच्या जंगलातल्या जोडीदारासोबत फिरत असल्याचे स्वप्न मला पडू लागले होत़े  होळी येऊन संपलीसुद्धा़  त्या दोन तीन दिवसात राणीची भेट न झाल्याने मी फारच अस्वस्थ झालो होतो होळी संपल्यावर लगेच राणीला भेटायला जायची तयारी करत असतानाच एक बातमी कानावर पडली, राणी गेली!! क्षणभर मी काही न समजल्यासारखा उभा राहिलो मला या बातमीवर अजिबात विश्वास वाटत नव्हता़ माझी राणी मला न भेटता.. नाही, ते शक्यच नाही़  प्रियाला घेऊन जमेल तितक्या लवकर मी राणीच्या भेटीसाठी निघालो़  माझं शरीर बधिर झालेलं होतं़  मन सुन्न झालं होतं़ राणीजवळ पोहोचलो तेव्हा ती शांत झोपलेली होती़  मी हाक मारली, ‘राणी’ नुसत्या पिंजऱ्याकडे येणाऱ्या पावलांच्या आवाजाने पिंजऱ्याला पकडून आमच्या स्वागताला उभी राहणारी राणी आज निपचीत पडली होती़  मी तिच्या मानेवरनं हात फिरवत पुन्हा हाक मारली, राणी ऊठ गं, प्लीज’, एकदा तरी माझ्याकडे बघ़  राणी, ऊठ ना़’ राणी मला सोडून केव्हाच दूर निघून गेली होती़  मला तिचा असा अचानक मृत्यू मान्य होत नव्हता़  स्वत:ला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो. कर्तव्य म्हणून शवविच्छेदन केलं आणि अंत्यसंस्काराची तयारी करायला सुरुवात केली़ माझ्यातला पशुवैद्यक हरला होता पण माणूस जिंकला होता़ तिच्या अंत्यसंस्काराला जाण्याचे सामथ्र्य माझ्यात नक्कीच नव्हते पण, प्रिया ऐकायला तयार नव्हती़  ती मला राणीजवळ घेऊन गेली. राणीवर लाकडं ठेवली जात असताना मी गळून चाललो होतो. काहीवेळाने चिता पेटली़  मृत्यू राणीचा झाला होता आणि संपलो मी होतो़  लाकडं तिच्यावर ठेवली होती आणि जड मी झालो होतो़  चिता तिची पेटली होती आणि मी जळून राख झालो होतो !
कहाणी संपली होती अन् आमचा डाव अध्र्यावरती मोडला होता.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...