सह्याद्रीत पेटताहेत जंगलं !

जंगलं जाळून पश्‍चिम घाट उद्‌ध्वस्त करण्यासाठी विविध घटकांनी संगनमत केले आहे. वनविभागाशी संगनमत करून इथल्या जंगलाला हेतुतः आग लावली जात आहे. यामुळं पर्यावरणावर परिणाम होणार आहे, त्याची पर्वा कुणालाच नाही. जंगलं नाहीशी झाल्यावर पाऊस पाठ फिरवेल आणि जगणं मुश्‍कील होईल.

सह्याद्रीचा दक्षिण-पश्‍चिम परिसर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांदरम्यान व्यापला आहे. कोयना, कास, चांदोली, राधानगरी हे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले वन्यजीव प्रकल्प आणि जागतिक वारसा ठिकाणं, जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील अतिसंवेदनशील परिसर आहेत. या उन्हाळ्यात या पश्‍चिम घाटाच्या परिसरात अनेक ठिकाणी जंगलाला आग लागलेली दिसत आहे. जंगलाला लागलेली आग हा नैसर्गिक वणवा नसून हेतुतः जंगलं नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. वन व सामाजिक वन, तसेच वन्यजीव विभागाशी संगनमत करूनच ही आग लावली जात असल्याचं या विभागाच्या प्रतिसादावरून दिसतं. ही वनं नष्ट झाल्यावर आज असलेली दुष्काळाची स्थिती किती गंभीर होईल, याचा विचार करणंसुद्धा अवघड आहे.

याच परिसरात सर्व नद्यांची उगमस्थानं असून इथल्या भौगोलिक रचनेचा व नैसर्गिक स्थितीचा विचार करून धरणं बांधली आहेत. ६८५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस निश्‍चितपणानं पडणार, अशी खात्री असलेला हा प्रदेश आहे. इथली धरणं भरली तरच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रचा बहुतांश भाग जगू शकतो हे वास्तव आपणास माहीत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस पडण्यामागं समुद्र सपाटीपासूनची उंची आणि तिथली घनदाट जंगलं आहेत.
कोयना, धोम, कण्हेर, वारणा, कडवी, कुंभी, कासारी, तुळशी, राधानगरी, काळम्मावाडी, पाटगाव अशी मोठी धरणं आणि शंभरपेक्षा जास्त लघू व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव या परिसरात आहेत. पश्‍चिम घाटाच्या या ६०० ते एक हजार - बाराशे मीटर समुद्रसपाटीपासून उंचीच्या परिसरात असलेला घनदाट जंगलाचा सलग पट्टा (कॉरिडोर) जैवविविधतेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील आहे.
सह्याद्रीच्या डोंगरामध्ये धुमसत असलेल्या आगी

आज कोयना- चांदोली यासाठी एकत्रित सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कास पुष्पपठार, राधानगरी अभयारण्य हे जंगल क्षेत्र अधिकृत घोषणा झालेलं आहे. त्यालगत अनेक ठिकाणी लहान-मोठं जंगलांचं क्षेत्र हे राखीव जंगल, सामाजिक वनीकरणाचं लागवड क्षेत्र आदींनी व्यापलं आहे. तितकंच खासगी जंगल क्षेत्र याच परिसराला संलग्न आहे. पाणी- जंगल याचबरोबर हे क्षेत्र खनिज क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र देखील आहे. करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल या परिसरात बॉक्‍साईट व इतर काही खनिजांद्वारे होते. काही कायदेशीर आणि अनेक बेकायदा खाण प्रकल्प या परिसरात सुरू आहेत; आणि काही नव्यानं सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. काहींना या परिसरात पर्यटकांसाठी व्यवसायाभिमुखदृष्ट्या बांधकामं करावयाची आहेत. काही बांधकामं झाली आहेत.

‘सेकंड होम’वाल्या पैसेवाल्यांची तर इथं जागा मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. फार्म हाउस, गेस्ट हाउस, सेकंड होम, वीक एंड होम अशा जाहिराती रस्त्याच्या दुतर्फा, शहरात, मॅगेझिनपासून सोशल मीडियावर झळकत आहेत. लवासा, ॲम्वे व्हॅलीसारख्या प्रकल्पांची स्वप्नं काही मंडळी या परिसरात रंगवत आहेत. काहींना डोंगरच खरेदी करायचा आहे. काही जण धरणांच्या काठावर आपला बंगला उभा करू पाहत आहेत. या सर्वच भागांत एजंटांचा सुळसुळाट सुरू आहे. कमिशन मिळविण्यासाठी एक साखळी तयार झाली असून महसूल- वन- कृषी पाटबंधारे अशा सर्व खात्यांतील ‘शार्प माइंड’ एकत्र आला आहे. नगरविकास खाते आणि त्यांचे प्रादेशिक आराखडे तयार करणारी अधिकारी मंडळी तर यामध्ये मार्गदर्शकाची, सल्लागारांची भूमिका बजावत आहेत. काहींना पर्यावरणाचे प्रेम भरले असून त्यांना जंगल काढून आंबा-काजूची बाग नेटकी करायची आहे.

एकूणच विविध घटकांची पश्‍चिम घाट उद्‌ध्वस्त करण्यासाठी आघाडी झाली आहे. वनविभागाशी संगनमत करून इथल्या जंगलाला हेतुतः आग लावली जात आहे. हळूहळू हा परिसर बोडका केला की ‘येथे जंगल नसल्यानं परवानगी मिळावी’ व ‘देण्यास हरकत नाही’ अशी मागणी व शेरा देणं सोयीचं ठरणार आहे.
आज जंगल आहे ही खुपणारी गोष्ट ठरत आहे. बाग करणं आणि त्यामध्ये आपला टुमदार बंगला पर्यावरणाशी मैत्रीचे गळे काढणारा दिसतो आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात महाबळेश्‍वर ते चांदोली या दरम्यान २२ ठिकाणी, तर चांदोली ते काळम्मावाडी या परिसरात ३१ ठिकाणी एकाच दिवशी जंगलाला ठिकठिकाणी आग लागलेली दिसली. हे नेमके शासकीय सुट्यांचे दिवस होते. अशा वेळी वनविभागाशी संपर्क होतच नाही. जेव्हा झाला तेव्हा ‘साहेब इथं नाहीत’, ‘मीटिंगला गेलेत’, ‘फिल्डवर आहेत’, ‘आमच्याकडं वाहन नाही’, ‘आमच्याकडं तितका स्टाफ नाही’, ‘हे वनविभागात घडत नसावं’, अशा छापातील उत्तरं मिळाली आहेत.

.

पश्‍चिम घाटावर मूठभर लोकांचा डोळा आहे. ते त्यांच्या स्वार्थासाठी सह्याद्रीची होळी करत आहेत. प्रशासनाला याचं देणं-घेणं नाही. स्थानिक नागरिकांचे हितसंबंध आणि भीती आडवी येत आहे. जंगलं नष्ट झाल्यावर पाऊस पाठ फिरवेल यात शंका नाही; पण जमिनीची प्रचंड धूप होऊन धरणं गाळानं भरायला वेळ लागणार नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या नागरी वस्त्या आणि पर्यटन केंद्रं, हॉटेलचा घनकचरा, सांडपाण्यांमुळं हे जलाशय प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आगीमुळं वातावरणात गेलेले दूषित वायू परत घेता येणार नाहीत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले अनेक जीव पुन्हा जन्माला येणार नाहीत. अनेक जाती-प्रजाती आपण मानवानंच या भागातून कायमच्याच नष्ट केल्या आहेत, हे विसरून चालणार नाही.

जैवविविधतेचं मूल्य आपल्याला समजलेलं नाही. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून खायला निघालेले हे नराधम सह्याद्रीला उद्‌ध्वस्त करणार आहेत. जंगल एकदा नष्ट झालं की दिसते ती बोडकी जमीन. बुलडोझरने समतल करून रस्ता, शेत, प्लॉट यापैकी काहीही करायला मग वेळ लागत नाही. जंगली झाडोरा दिसला तरी प्लॉट, जमीन खरेदी होत नाही. घेणारा थोडा बिचकतो. म्हणून जंगलं जाळूनच तुम्हाला रिकामा डोंगर किंवा जमीन दाखवतो, असा अट्टहास आहे.

यापूर्वी तोडलेल्या जंगलाच्या क्षेत्रात गवत आहे, त्यालाही वारंवार आग लावली जाते. शिवाजी विद्यापीठाच्या कंपाउंडमध्ये देखील असं गवत जाळल्यांतर समर्थन करणारे तज्ज्ञ आहेत. पश्‍चिम घाटातील वनस्पती विद्यापीठात बोटॅनिकल गार्डन करण्यात कोट्यावधी रुपये खर्च करून धन्यता मानली जाणार असेल, तर पश्‍चिम घाट जपणं शक्‍य नाही. कृषी विभागाचे उमेश पाटील हे कोल्हापुरात कार्यरत असताना ‘पाचट जाळू नका’ ही आदर्श मोहीम यशस्वी त्यांनी केली. त्यादरम्यान जंगलं देखील जळाली नाहीत. नवा अधिकारी आल्यावर ही मोहीम बंद झाली. जंगल क्षेत्रात पर्यटन निवास बांधणं, खासगीकरणानं पर्यटन प्रकल्प चालवणं, पर्यायी जमीन व पैसे भरून घेऊन जंगल क्षेत्र मागेल त्या प्रकल्पाला देऊ करणं, वृक्षतोड, जंगलाला आग, तस्करी, शिकारीकडं दुर्लक्ष करणं यामध्येच वनविभागाचे अधिकारी व्यग्र आहेत.

पश्‍चिम घाटाबद्दलची ही अनास्था, दुर्लक्ष, हेतुतः केलेली कृती, संगनमत, अर्थपूर्ण व्यवहार, मानवाचा सुखाचा हव्यास आणि चैन खूप मोठा नैसर्गिक ठेवा संपवणार आहे, यात शंका नाही. पावसाने पाठ फिरवली, धरणं गाळानं भरली तर काय माती खायची का? सरकारनं याबाबत गांभीर्यानं दखल घेतली नाही तर सह्याद्रीची होळी झालेली पाहावी लागेल.

-उदय गायकवाड (Sakal)

नळदुर्गच्या किल्ल्यात वटवाघळांचा 'घरोबा'!(Amazing Bats)

पुण्यात  सर्वाधिक प्रजाती, उस्मानाबादेत लाखोंनी वास्तव्य

 काळजाचा थरकाप उडविणारा आवाज, भोवळ येईल असा तीव्र दर्प आणि एकाच वेळी हजारोंच्या संख्येने झेपावणारा थवा.. वटवाघळांच्या विश्वाची अशी थरारक सफर करायची असेल, तर एखादा हॉलिवूडपट पाहायला हवा. पण त्याचीही आता गरज नाही. याचे कारण उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी हॉलिवूडपटापेक्षा अधिक आश्चर्यकारक वटवाघळे सहज पाहावयास मिळतात.
आपल्या ऐतिहासिक खुणा शतकानुशतके सांभाळत नळदुर्गच्या किल्ल्यात लाखाच्या पटीत वटवाघळांनी घरोबा केला आहे. राज्यात सर्वाधिक असे हे प्रमाण असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. राज्यात वटवाघळांच्या सर्वाधिक प्रजाती पुणे जिल्ह्य़ात, तर सर्वात जास्त वटवाघळांचे वास्तव्य उस्मानाबाद जिल्ह्य़ात असल्याचेही या पाहणीचे निष्कर्ष आहेत.
एरवी वटवाघूळ म्हणजे किळसवाणा प्राणी. ते स्वतची विष्ठा खातात. अंगाला चिकटतात, कान कुरतडतात. एवढेच नव्हे, तर पती-पत्नीचे संभाषण चोरून ऐकणारा वटवाघळाच्या जन्माला जातो, असे किती तरी समज-गरसमज आजही प्रचलित आहेत. परंतु त्यामुळेच पर्यावरणाचा खरा मित्र असलेले वटवाघूळ मानवाच्या हेटाळणीचा विषय होऊन बसले. राज्यात वटवाघळांची संख्या नेमकी किती आहे, त्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत, त्यांची वास्तव्याची ठिकाणे कोणती, त्यांची जीवनपद्धती काय आहे, यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून फारसा अभ्यास झालाच नाही. जगभरातील अनेक देशांत वटवाघूळ अभ्यासाचा विषय आहे. आपल्याकडे त्याची उपेक्षाच होते.
मात्र, प्रचलित समज दूर करून पर्यावरणाच्या निसर्गचक्रात वटवाघळांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण कशी आहे, हे शोधण्याचे काम बारामती येथील पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड करीत आहेत. पुणे विद्यापीठातून पश्चिम घाटातील वटवाघळांची जैविकता या विषयावर पीएच. डी. प्राप्त हा अवलिया महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये रात्रंदिवस वटवाघळांचा अभ्यास करीत हिंडत असतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या वटवाघुळांचा अभ्यास करून नळदुर्ग येथील किल्ल्यात राज्यात सर्वाधिक संख्येने वटवाघूळ असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
जगभरात वटवाघळांच्या सुमारे एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. सस्तन प्राणी असलेल्या वटवाघळांच्या महाराष्ट्रात जवळपास ३४ प्रजाती आढळतात. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ प्रजातींची नोंद करण्यात आली. मात्र, त्यांची संख्या उस्मानाबादच्या तुलनेत खूप कमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ११ प्रजाती आढळतात. यातील काही प्रजातींची संख्या तर एकाच ठिकाणी ५० हजारांहून अधिक असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. जिल्ह्यात आढळणाऱ्या ११ प्रजातींपकी रायनोकोमा हार्डविकी हे शेपटी असणारे अत्यंत दुर्मिळ वटवाघूळ नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजावर आजही अस्तित्वात आहे. कीटकभक्षी असणारी ही प्रजाती मोठय़ा वेगाने लुप्त होत आहे. राज्यात नळदुर्गनंतर चंद्रपूर व अन्य एक-दोन ठिकाणीच ती उरली असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यात आढळणाऱ्या ११ पकी फ्लाइंग फॉक्सेस, सायनेटेरस स्फिन्स, राऊझेटस लेस्त्रॉल्टि या तीन प्रजाती फलाहारी ट्राडारिडा किल्क्टा, टॅप्यूजस लॉन्जिमॅनस, स्कोटोफिलस हिबी, पिपिस्ट फोलोनिक्स, पिपिस्टल कोलोमान्ड्रा, हिप्पोसायरस ज्यूरिस, हिबी या ७ कीटकभक्षी, तर मेगाडर्मालायरा नावाची बेडूक व उंदीर खाणारी प्रजातीही जिल्ह्यात आढळून येते.
पर्यावरण व शेतीच्या दृष्टीने वटवाघळांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याची बाब डॉ. गायकवाड यांनी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या लक्षात आणली. त्यानुसार २०१३-१४ या वर्षांसाठी सरकारने ग्रीन आयडियाज् योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील वटवाघळांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प आखला. त्याच्या पूर्ततेची जबाबदारी वटवाघळांचे संशोधक डॉ. गायकवाड यांच्यावर सोपविली. जिल्हाभरात त्यांनी केलेल्या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११ प्रजातींपकी एकटय़ा नळदुर्ग किल्ल्यात ५ प्रजातींची वटवाघळे वास्तव्यास आहेत. यातील राऊझेटस लेस्त्रॉल्टि या प्रजातीची संख्या तर लाखाच्या पटीत आहे.
जिल्ह्यातील काटी, धामणगाव, सिंदफळ, आपसिंगा, उस्मानाबाद, किणी, कुंथलगिरी, परंडा येथील भुईकोट किल्ला, अचलबेट, अचलेर, नंदगाव, मुळज, वागदरी, तुळजापूर, येडशी, खानापूर, इंदापूर, कळंब अशा अनेक गावांमध्ये वटवाघळे आढळून येतात. झाडावर, जुन्या वाडय़ात, घरातील दरवाजा अथवा िभतीच्या फटीत, जुनी, मंदिरे, विहिर, गुहा आणि डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. गायकवाड गुहेत अक्षरश सरपटत जाऊन त्यांचा शोध घेत आहेत.
वटवाघूळ शेतकऱ्यांचा मित्र - गायकवाड
वटवाघळांना नाकाद्वारे गंध घेण्याची निसर्गतच अलौकिक शक्ती मिळाली आहे. कोणत्याही फळाला पाड लागल्याचा गंध सर्वप्रथम वटवाघळांना येतो. आंबा पाडाला आल्याची सूचना शेतकऱ्यांना वटवाघळामुळेच मिळते. पाखरखाती म्हणून जी फळे आपण मोठय़ा आनंदाने तोतरे बोलणाऱ्या लहान मुलांना देतो, मुळात ती वटवाघळांनी चाखलेली असतात. कीटकभक्षी वटवाघुळे एका रात्रीत सुमारे दीड हजारांच्या आसपास डासांचे भक्षण करतात. त्यामुळेच निसर्गातील कीटकांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते. कीटक, बेडूक व उंदीर अशा शेतीस उपद्रव करणाऱ्या घटकांनाही वटवाघळांमुळे र्निबध बसतो. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे मित्र आहेत. फलाहारी वटवाघळांमुळे झाडांच्या बियांचे विस्तारीकरण होऊन नसíगकरीत्या वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण काम अनेक शतकांपासून अविरत सुरू आहे. अशा रितीने वटवाघळांचे आपल्या गावात वास्तव्य असल्यास त्याची माहिती कळवावी, असे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले आहे.


 सौजन्य: लोकसत्ता

Related Posts Plugin for WordPress, Blogger...